E R News Marathi
शिरूर | प्रतिनिधी
करडे गावातील गोळीबार प्रकरणात शिरूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळत तपासातील मोठे यश मिळवले आहे. सराईत गुन्हेगारावर भररस्त्यात पिस्तुलातून गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळले आहे. १८ जुलैच्या मध्यरात्री करडे येथील भैरवनाथ मंदिराजवळील तळ्याच्या परिसरात निखिल सतीश थेऊरकर याच्यावर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याला लक्ष्य केले होते. घटनेनंतर शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली आणि पाच आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचाही सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दादया पंचमुख, आदित्य लंघे, निखिल कायस्थ आणि सनी मस्के यांचा समावेश आहे. तपासात हल्ल्यामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि मारहाण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ७२ तासांत आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.