कोल्हापुरात भयानक प्रकार समोर आला, सासूला माँसाहेब, नणंदेला राणीसाहेब , नवऱ्याला सरकार म्हणण्याची विवाहितेवर सक्ती ? बारशापूर्वीच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मानसिक छळाच्या आरोपांनी कोल्हापूर हादरले

ई आर न्यूज मराठी
प्रतिनिधी – तानाजी करचे (Investigative Reporter)
कोल्हापूर : जिल्ह्यात भयानक प्रकार समोर आला आहे
विवाहित जोडप्याच्या एक महिन्याच्या चिमुकलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच 29 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात मृत विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर मानसिक व आर्थिक छळ, हुंड्यासाठी दबाव तसेच मुलगी झाल्यामुळे अपमानास्पद वागणूक दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.
मृत विवाहितेच्या आई-वडिलांचा आरोप आहे की, लग्नानंतर मुलीवर अनेक प्रकारची बंधने लादण्यात आली होती. सासूला “माँसाहेब”, सासऱ्यांना “आबासाहेब”, नणंदेला “राणीसाहेब” आणि पतीला “सरकार” अशी संबोधने करण्याची सक्ती केली जात होती. याशिवाय घरातील प्रत्येक गोष्ट ठराविक पद्धतीनेच करावी लागत होती. या सर्व प्रकारामुळे ती सतत मानसिक तणावाखाली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
माहेरच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, विवाहानंतर वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारेही पैसे दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मुलीच्या बारशासाठी महागडा पाळणा घेण्याचा आग्रह धरला गेला होता. तसेच मुलगा होईल या अपेक्षेने आधीच मुलाचे कपडे खरेदी करण्यात आले होते; मात्र मुलगी जन्माला आल्यानंतर विवाहितेला टोमणे मारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी मृत्यूचा तपास सुरू केला असून शवविच्छेदन, घटनास्थळ पंचनामा आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. अधिकृत माहितीनुसार, या प्रकरणात पती, सासू, सासरे आणि नणंद यांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
ई आर न्यूज मराठीने उपस्थित केलेले प्रश्न
१) विवाहानंतर विवाहितेवर मानसिक दबाव टाकला जात होता का?
२)संबोधनांची सक्ती हा कौटुंबिक संकेत होता की मानसिक छळाचा भाग?
३) प्रत्येक हुंडा किंवा पैशांच्या मागणीचे आर्थिक पुरावे तपासात समोर येणार का?
४)मुलगी जन्माला आल्यामुळे भेदभाव झाला का?
५) मृत्यूपूर्वी महिलेने कोणाला तक्रार केली होती का किंवा कोणते संदेश, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत?
६)या प्रकरणात न्यायवैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासातून नेमके काय निष्पन्न होते?